सत्यजित तांबेंबाबत फडणवीसांचे मोठं विधान; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने मात्र अखेरपर्यंत या निवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीमागे भाजपचाच हात असल्याचं बोललं जात आहे. याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) याना विचारलं असता त्यांनी सत्यजित तांबे यांची स्तुती करत संकेतच दिले आहेत.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, एक युवा नेता म्हणून आणि व्यक्ती म्हणून सत्यजित तांबे यांचे काम निश्चितपणे चांगलं आहे. परंतु शेवटी राजकीय निर्णय हे धोरणात्मक पद्धतीने आणि योग्य वेळी घ्यायचे असतात. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो, पण सगळेच नेते तिथं होते त्यामुळे या सर्व घडामोडींबाबत आम्ही कोणतेही गणित घडवलेले नाही असं म्हणत त्यांनी सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी कोणता उमेदवार द्यायची यावर आमची चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती पण काही कारणाने त्यांनी असमर्थता दाखवली आणि मग उमेदवारी द्यायचं नाही असं ठरलं, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाकडून ऑफर देण्यात आली आहे याबाबत विचारलं असताना फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असले तरी त्या कधीच त्या दरवाजाने जाणार नाहीत. भाजप हेच त्यांचं घर आहे. त्यामुळे हे मनातील मांडे मनातच राहणार आहेत असं फडणवीस यांनी म्हंटल.