मोदींमुळेच भारतात कोरोना आला – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना स्थितीला पूर्णतः पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षअ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. त्यांनी देशात योग्य वेळी परदेशी पाहुण्यांना बंदी केली असती किंवा त्यांची चाचणी करून त्यांना प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या प्रमाणात करोना पसरलाच नसता. भारतात करोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. अकोल्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे. या साथीच्या आजारामुळे तसेच संचारबंदीमुळे जी परिस्थिती उदभवली आहे. त्यासंदर्भात त्यांनी राज्य व केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

टाळेबंदीमध्ये १५ कोटी लोकांचे हाल झाले. करोनाची भीती सरकारने आणली. तुम्ही मरणारच आहे, हे जनतेच्या मनावर सरकारकडून बिंबवले गेले. ३० जूनपर्यंत देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा पाच लाखापर्यंत जाईल. त्यानंतर टाळेबंदी थांबवण्यात येईल. करोनाबाधितांची संख्या कमी असतांना कडक टाळेबंदी आणि आता रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात जात असतांना टाळेबंदी शिथिल करण्यात येत आहे, हा सर्व प्रकार अनाकलनीय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. मूळात टाळेबंदी लागू करणेच चुकीचे आहे. आतापर्यंत साथीने अनेक आजार आले. मात्र, कधी टाळेबंदी लागू करण्यात आली नाही. सरकार देशातील जनतेला जगण्याची सकारात्मक हिंमत देण्याऐवजी त्यांना भयभीत करीत आहे. आपल्या फायद्याासाठी केंद्र सरकारचे हे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

भाजपा सरकारने बिघडवलेली अर्थव्यवस्था सुधारण्याची काही स्थिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंपन्यांना उत्पादन करण्यास सांगण्यात आले असले तरी त्याला खरेदीदार हवा. अन्यथा उत्पादक कंपन्यांवर संपूर्ण भार वाढेल. शाळा सुरु करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकार त्यावरही साशंक असल्याचे सांगितले. केंद्र राज्यावर, तर राज्य जिल्ह्यावर निर्णय सोडून देतात. शाळांसंदर्भात ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. केंद्र व राज्यात राजकीय नेतृत्वच नाही. असाही  आरोप त्यांनी यावेळी केला आहे. निर्णयक्षमतेचा अभाव असल्याची टीका  केली. भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीवरही त्यांनी भाष्य केले. या पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकार नरेंद्र बेलसरे यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश घेतला.

Leave a Comment