सात वर्षात मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना विरोधकांवर निशाणा साधला होता. माझा इतिहास बघा, गेल्या 7 वर्षात जुन्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत असून त्यातच माझा सगळा वेळ जात आहे असे म्हंटल होत. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून मोदींवर निशाणा साधला. सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हल्द्वानी येथील सभेत जुन्या गोष्टी सुधारण्यात माझी सात वर्षे गेली असल्याचे वक्तव्य केले. पण सात वर्षात पंतप्रधानांनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

या काळात एकतर त्यांनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले वा आधीच्या योजनांचे नाव बदलून किंवा त्यात बदल करून पुन्हा जनतेसमोर सादर केल्या. अनेक सरकारी कंपन्या विकण्याचा उपक्रम त्यांनी आखून ठेवलाय. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. असा आरोप राष्ट्रवादीने केला.

भाजप विरोधात असताना त्यांनी आधार कार्डला विरोध केला. पुढे सत्तेत आल्यावर मागील सरकारने आखलेल्या रस्त्यावरच पावलं टाकत, आधारकार्डचा राजमार्ग स्वीकारून लोकांना आधारकार्ड बनवण्याची सक्ती केली. इतकेच नव्हे तर आधी जीएसटी प्रस्तावाला विरोध करून सत्तेत आल्यावर जीएसटी धोरण आणले.

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला आधुनिकतेची ओळख पटवून दिली. याच विचाराचा अवलंब करून डिजीटलायझेशनचा नारा मोदींनी दिला. अशा एक ना अनेक मागील सरकारच्या गोष्टीच पुढे नेत मोदी काम करत असताना कोणत्या जुन्या गोष्टी सुधारण्यात आल्या असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. अस म्हणत राष्ट्रवादीने मोदींवर टीकास्त्र सोडलं.

Leave a Comment