Monday, December 15, 2025
Home Blog Page 2683

साताऱ्यातील अपशिंगे गावाला आर्मीकडून ‘रणगाडा’ भेट; सर्वत्र भारत माता की जयचा जयघोष

कराड | प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. मात्र साताऱ्यातील आपशिंगे हे गाव मात्र अश्या वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरातल्या एकातरी व्यक्तीने सैन्यात भरती व्हायचंच असा इकडे अलिखित नियम आहे. या गावात ८५० कुटूंब आहेत. इथली लोकसंख्या जवळपास ६ हजाराच्या घरात आहे. तर त्यापैकी ५०० हून अधिक लोकं सैन्यात आहेत. नुकताच या गावाला आर्मीकडून एक रणगाडा भेट देण्यात आला आहे. गावातील प्रत्येक घरातील किमान एक तरी मुलगा सैन्यामध्ये असलेल्या गावात आता प्रत्यक्ष रणगाडा आल्याने गावकऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. बहुदा सातारा जिल्ह्यातील अपशिग हे एकच गाव असेल की त्या ठिकाणी रणगाडा आहे.

साताऱ्यातील आपशिंगे या गावात नुकतेच मिलिटरी येथून एक रणगाडा देण्यात आला आहे. त्याचे ग्रामस्थांनी जल्लोशी स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी गावातून या रणगाड्याची तुतारीच्या निनादात भव्य अशी मिरवणूक काढली. तर गावातील महिलांनी रणगाड्याचे हळदी कुंकु लावून पूजन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात असणारं एक गाव म्हणजे आपशिंगे मिलिटरी गाव. सातारा जिल्ह्यापासून १८ किमी अंतरावर असणाऱ्या या गावात आजही प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात आहे. साताऱ्यात तसं पाहायला गेलं तर अनेक मिलिटरी शाळा आहेत. सैनिकांचा वाढता ओघ बघता इथल्या मिलिटरी स्कूलची व्याप्ती वाढत गेली आणि हे गाव जगाच्या नकाशावर झळकू लागलं.

तसं पाहायला गेलं तर आपशिंगे गावात एकही मिलिटरी स्कूल नाहीये. त्यासाठी त्यांना सातारा किंवा पुण्यात जावं लागतं. पण इकडच्या तरुणांना लहानपणापासूनच आर्मीचे डोस मिळतात ते इकडच्या निवृत्त झालेल्या जवानांकडून. या गावात अनेक निवृत्त जवान आहेत. त्यामुळे गावाला एक वेगळीच शिस्त आहे. गावातील तरुणही  त्यांची शिस्त पाळतात. सैनिकात जायचं म्हणजे अंगी शिस्त असणं फार महत्त्वाचं असतं. निवृत्त जवानांकडून सैन्याचे बाळकडून मिळाल्यानंतर ते सैनिक शाळेत भरती होतात आणि सीमेवर लढण्यास सज्ज होतात.

काय आहे गावचा इतिहास

या गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं नाव पडण्यामागे एक इतिहास आहे. पहिल्या महायुद्धात या गावातील अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्यामुळे ब्रिटिशांनीच या गावाचं नाव आपशिंगे मिलिटरी असं ठेवलं, असं सांगण्यात येतं. पहिल्या महायुद्धात या गावातील जवळपास ४६ जवान शहिद झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक युद्ध झाली. त्या प्रत्येक युद्धात या गावातील सैनिक होताच. १९६२ साली चीनविरुद्ध झालेल्या युद्धात या गावातील ४ जवान शहीद झाले. तर, १९६५ साली पाकिस्तानविरोधात झालेल्या युद्धात या गावातील २ जवांनाना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते. त्यानंतर पुन्हा १९७१ साली पाकिस्तानसोबत युद्ध झालं, त्यावेळी एका जवानाने आपले प्राण अर्पण केले होते. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतही या गावातील ४ जवान सामिल झाले होते. असा रंजक इतिहास या गावाला आहे. या गावातील अनेकांची आडनावे निकम आहेत. ते निकुंभ राजपूत या घराण्याचे वारस असल्याचे सांगितलं जातं.

वीज वितरणच्या गलथान कारभाराने शेतकऱ्याचा बळी : तीनजण बचावले

कराड | हेळगाव (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व शेतकरी सुनील शंकरराव पाटील यांचा शेतात पाणी पाजताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे चुलते किसन पाटील हेही शॉक लागून किरकोळ जखमी झाले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ही घटना घडली असून यातून तीनजण सुदैवाने बचावले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हेळगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हे आपल्या शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात असणाऱ्या खांबावरील विजेची तार विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारेवर तुटून पडल्याने शेतातील पाण्यात वीज प्रवाह चालू झाला. त्यामुळे सुनील पाटील हे पाणी पाजत असताना त्यांना विजेचा तीव्र धक्का लागून ते जागीच मृत्युमुखी पडले. त्यांना शोधण्यासाठी गेलेले त्यांचे चुलते किसन गणपती पाटील यांंनाही विजेचा शॉक लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर यांच्या पत्नी नंदा पाटील व चुलत बंधू अनिल पाटील यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने दोघेजण या घटनेतून बचावले आहेत. सदर घटनेची फिर्याद मसूर पोलिसात देण्यात आली आहे.

दरम्यान सुनील पाटील हेळगावसह परिसरातील एक सोज्वळ व हसतमुख व्यक्तिमत्त्व होते. ते भाऊ या नावाने परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अखेर त्या तारेनेच घेतला बळी… तर घटना घडलीच नसती…

सुनील पाटील यांच्या शेतात उभ्या असलेल्या खांबावरून रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या खांबावर बिन कामाची एक विजेची तार बऱ्याच दिवसापासून ठेवण्यात आली होती. सदरील तार काढण्याबाबत सुनील पाटील यांनी वीज वितरण कंपनीला तोंडी व लेखी कळवले होते. मात्र वीज वितरण कंपनीने कोणतीही दखल न घेतल्याने त्याचा नाहक फटका पाटील कुटुंबीयांना बसला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पाटील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा सर्वत्र निषेध होत आहे.

राज्यपाल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे वागत आहेत; शिवसेनेची सडकून टीका

RAUT KOSHYARI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य अन् त्यामुळे विधानसभेत झालेल्या गोंधळामुळे राज्यपालांनी मधेच सोडलेलं अभिभाषण या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत भाजप आणि राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गोंधळास सुरुवात केली व राज्यपाल ठरल्याप्रमाणे भाषण सोडून निघून गेले. त्यांनी ‘जय हिंद’ ही म्हटले नाही व ‘जय महाराष्ट्र’ही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. अनेक राज्यांच्या विधानसभा अधिवेशनात याआधी राज्यपालांचे भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचे उदाहरण नाही, पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाटय़ घडविण्यात आले त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाटय़ाचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले. अलीकडे लोक खाल्ल्या मिठास जागताना तर दिसत नाहीत, पण राज्यपाल महोदय जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. अर्थात त्यामुळे दूध नासणार नाही. त्या दुधाचे दही किंवा लोणी होईल. विरोधी पक्षाने त्यांची घुसळण कायम ठेवली पाहिजे.

राज्यपाल हे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे ते वागत आहेत. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवीत आहेत ते सर्व फुसकेच ठरत आहेत. राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे 170 चे बहुमत कायम आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे? असा सवाल शिवसेनेनं केला.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अलीकडच्या काळात दोन घाणेरडी विधाने केली. सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी केलेले विधान समस्त स्त्रीवर्गाची मान खाली जावी असेच आहे. राज्यपालांनी हसत खेळत सावित्रीबाईंचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत राज्यपालांनी त्यांच्या गुरूचा शोध लावून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या. याची लाज भाजपास वाटू नये याचेच आश्चर्य वाटते. महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची माफी मागा अशा घोषणा काही सदस्यांनी दिल्या असतील, तरीही राज्यपालांनी भाषण 90 सेकंदांत गुंडाळणे योग्य नव्हते असेही शिवसेनेनं म्हंटल.

तापोळा-बामणोली एकात्मिक पर्यटन साखळीसाठी विकास आराखडा तयार करावा : आदित्य ठाकरे

सातारा | सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रातील तापोळा, बामणोली, मुनावळे, वाघोळी परिसर मुबलक पाणी आणि वन क्षेत्राने समृद्ध असल्याने पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. येथे पर्यावरणपूरक योजना आखून एकात्मिक पर्यटन साखळी निर्माण करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. मंत्री ठाकरे म्हणाले, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना कोयना धरण परिसरात पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यास मोठा वाव आहे. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात नाशिक, गणपतीपुळेच्या धर्तीवर बोट क्लब विकसित करता येईल. पर्यटकांना सुविधा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. यासाठी एमटीडीसीने व्यवहार्यता तपासून विकास आराखडा तयार करावा. पुढील टप्प्यात कॅराव्हॅन, तंबू, स्कुबा डायव्हिंग आदींचाही विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर आणि कास पठार येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तापोळा, बामणोली, मुनावळेच्या रूपाने पर्यटनाची एकात्मिक साखळी तयार करता येईल. यामुळे पर्यटनाच्या नवीन संधी उपलब्ध होऊन महाबळेश्वर आणि कास पठारावर येणारा पर्यटक या परिसराचाही आनंद घेऊ शकेल. यासाठी महाबळेश्वर ते तापोळा रस्ता रूंदीकरण करण्यात येणार असून पाण्यात केबल स्टेड पूल आणि दर्शक गॅलरी देखील तयार करता येईल. काही ठिकाणी रोप वे उभारून निसर्गाचे नयनरम्य दर्शन घेता येईल.

पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, निसर्गाने नटलेल्या या परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा. बोट क्लबच्या माध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल, यावर भर द्यावा. स्थानिक बोटींबरोबरच आधुनिक सुविधांचा मेळ साधावा. जल पर्यटन बरोबरच साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग यामध्ये नाविन्यता आणावी. एमटीडीसीच्या जल पर्यटन विभागाचे श्री.सारंग यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे या परिसरात विकसित करता येणाऱ्या संभाव्य पर्यटन सुविधांबाबत माहिती दिली.

चार भिंती अन् मंडपात बारावीचे परीक्षा केंद्र

exam

औरंगाबाद – विनाप्लास्टरच्या उभ्या केलेल्या चार भिंती… दरवाजे अन् खिडक्यांसाठी तयार केलेल्या चौकटी बिनबोभाट तशाच उघड्या… छप्पर तर नाहीच… अन् ऊन लागू नये म्हणून चक्क लग्नासाठी टाकतात तसा मंडप टाकलेला… हे चित्र दुसरीकडे दिसले असते तर त्याची फारशी चर्चा झाली नसती. पण बारावीच्या एका परीक्षा केंद्रावरील ही वस्तुस्थिती असल्याने विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर कसा दिला असेल, याची कल्पनाच करवत नाही !

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला शुक्रवारी सुरवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने प्रशासनाकडून जोरदार नियोजन केल्याचा दावा केला जातो. परंतु, पहिल्याच पेपरला ग्रामीण भागातील केंद्रांवर सुविधांचा अभाव दिसून आला. निलजगाव येथील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर चार भिंती अन् वर मंडप अशा ठिकाणी घामाघूम झालेले विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आले. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभाग, एसएससी बोर्ड व पोलिस प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली असली तरी, ग्रामीण भागात काही केंद्रावर नियमावली धाब्यावर बसविण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सकाळी दहापासून पेपर घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर परीक्षार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या वरती लग्नमंडपाचे कापड टाकून शेड तयार करण्यात आले होते. या शेडमध्येच विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी बसविण्यात आले होते.

सध्या या शाळेचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे तेथे परीक्षा हॉलमध्ये वाळूचा चाळणा देखील ठेवण्यात आला होता. येथील परीक्षा कक्षात फॅन, लाईट अशी कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे विद्यार्थी घामाघूम होऊन अंधाऱ्या खोलीत पेपर सोडवित होते. या परीक्षा घेण्यात येत असलेल्या वर्गांना ना खिडक्या होत्या, ना दरवाजे. त्यामुळे केंद्राबाहेर जमलेले विद्यार्थ्यांचे मित्र, नातेवाईक शाळेच्या भिंतीवर खिडकीतून चढून कॉपी पुरवत होते. मात्र, त्यांना कोणीही अडवताना दिसले नाही. भरारी पथकाला देखील या ठिकाणीच काहीच आढळून आले नाही हे विशेष! याबाबत विचारणा केली असता शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

युक्रेनमधून मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप परतले

औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेलेले मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप पोहोचले आहेत. 33 विद्यार्थी अद्यापही तिकडेच अडकले असून, पालकांची चिंता वाढली आहे. अडकलेल्या विद्यार्थ्यांना हंगेरी, रोमानिया, पोलंडच्या सीमेपर्यंत प्रवास केल्यानंतर त्याचा भारतीय विमानाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रशासनाने काल 33 विद्यार्थी अडकल्याची माहिती दिली. चौघेजण बुधवारी औरंगाबाद मार्गे जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. गुरुवारी आणि शुक्रवारी सात जण आले. रशिया युक्रेनमध्ये युद्ध अडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंताग्रस्त आहेत. नऊ दिवसांपासून पालकांची झोप उडाली असून ते मुलांच्या संपर्कात आहेत. युक्रेनमधील व्हिनित्सिया, युझोई, ओबॅस्क, ओडेसा, कीव्ह, लिव्ह, जॉर्जिया ठिकाणी विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी मराठवाड्यातील 115 विद्यार्थी आहेत. त्यातील 82 विद्यार्थी परतले आहेत.

युक्रेनमधून परतलेले विद्यार्थी –
जालना – 6
औरंगाबाद – 11
परभणी – 3
हिंगोली – 7
नांदेड – 33
बीड – 1
लातूर – 14
उस्मानाबाद – 7

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर

औरंगाबाद – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर ऑफलाईन पद्धतीने दिला. दोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल्याने शैक्षणिक प्रवाह पुन्हा सुरु झाल्याचा चित्र दिसून आले. शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील 470 कनिष्ठ महाविद्यालये, शाळांपैकी 153 मुख्य तर 287 उपकेंद्रे अशा 440 परीक्षा केंद्रांवर आज परीक्षा पार पडली.

जिल्ह्यातील 58 हजार 343 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. केंद्रावर विद्यार्थ्यांना तासभर आधी उपस्थित राहायच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तर काही केंद्रांनी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टाईम दिला होता. यामुळे सकाळी 9 वाजेपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी केली. ऑनलाईन शिक्षण घेऊन दोन वर्षांच्या खंडानंतर ऑफलाईन पेपरला सामोरे जाताना काही विद्यार्थी साशंक वाटले. तर काही विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण दिसून आली. पहिलाच पेपर कंपल्सरी इंग्रजी भाषेचा असल्याने केंद्रांवर अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात 7 जिल्हास्तरीय, 9 तालुकास्तरीय, समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके तैनात आहेत. मुख्य केंद्रावर चार सदस्यीय आणि उपकेंद्रावर रनर यांनीच बैठ्या पथकाची भूमिका बजावली. परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या जात असताना काॅपीमुक्त परीक्षेबद्दल मात्र कोणीच बोलत नसल्याने काॅपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोरीवरून नडले, सिग्नलवर भिडले ! कल्याणच्या सिग्नलवर दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र प्रकार घडला. यामध्ये एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद इतक्या विकोपाला गेला, की कार चालकाने गाडीसमोर उभे राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात हि घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात रेड सिग्नल लागला होता. वाहन चालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत असताना एक बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला आणि त्याने कारवर मारायला सुरूवात केली. यानंतर एका तरुणाने त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू शकतो, या संशयातून हि संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

कारसोबत फरफटत नेलं
त्या ठिकाणचा सिग्नल ग्रीन होताच कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यानंतर वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार चालकाला शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण चौधरी असे या आरोपी कारचालकाचे नाव आहे.

प्रेमसंबंधांचा संशय
प्रवीणचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्रिवेशला आला. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आला. म्हणून त्याने आधारवाडी चौकात त्रिवेशला अडवून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. मात्र शहर पोलिस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नचे ‘ते’ स्वप्न ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते भारताने पूर्ण केलं

shane warne

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचा 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जगातील संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी हि एक धक्कादायक बातमी आहे.

दिग्गज शेन वॉर्न यांना ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून ओळखले जाते. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानले जाते. आतापर्यंत त्यांच्या नावावर क्रिकेट विश्वात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.

कर्णधार बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शेन वॉर्नने जानेवारी 2007 मध्ये सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर शेन वॉर्नने 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधार पदापर्यंत मजल मारली मात्र त्यांना कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यानंतर शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्यांनी प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सला आयपीएलचे चॅम्पियन बनवले.

साफ सफाई करण्याच्या वादातून दोघा भावांची बिल्डरला मारहाण

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरात दोघां भावांनी एका बिल्डरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. बांधकाम व्यावसायिकला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. साफसफाई करताना सिमेंटचे पत्र हटवण्यावरुन बिल्डरचा दोघा भावांशी वाद झाला होता. आमच्या जागेवरील पत्रे तुम्ही कसे हटवता, याचा जाब विचारत दोघांनी बिल्डरला मारहाण मारहाण केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात दिनकर हाईट्स ही तीन मजली इमारत आहे. घटनेच्या वेळी इमारतीचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते.

पत्रे हटवण्यावरुन झाला वाद
या जागेवर असलेले काही सिमेंटचे पत्रे हटवताना याच परिसरात राहणाऱ्या निलेश गायकर नावाच्या व्यक्तीने हा पत्रा आमचा आहे, जागा आमची आहे, तू पत्रे का हटवतोस, असे सांगितले. यावरून आशिष आणि निलेश यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर निलेश गायकर आणि त्याचा भाऊ अमित गायकर यांनी बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणेला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर आशिष गव्हाणे यांनी मानपाडा पोलिसांत दोघां भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.