राज्य सरकारने नामांतराचा निर्णय घेताच ओवैसींचा हल्लाबोल; म्हणाले, इतिहास हा इतिहासच असतो…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील,” असा हल्लाबोल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी शिंदे सरकारवर केला.

ओवैसी म्हणाले, आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही. महाराष्ट्रातील शिंदे सरकारनं राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव केलं आहे.

आम्ही नामांतराविरुध्द यापूर्वी मोर्चा काढला होता, लोकांनीही विरोध केला होता. आज सरकारकडं संख्याबळ आहे, ते लोकांना विश्वासात न घेता काहीही करत आहेत. ही हुकूमशाही आहे. आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही. केंद्र सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे. नाव बदलाबाबत महाराष्ट्र सरकारच्या मागण्या केंद्र सरकारनं मंजूर केल्या आहेत, त्यामुळे आता औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे.