कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून दडपले जाणार- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काल साताऱ्यातील कराड इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. तसेच काल महाजनादेश यात्रेदरम्यान रस्त्यावर प्रचंड बंदोबस्त असताना, सुरक्षा यंत्रणेला चकवा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून निषेध व्यक्त केला. पलूस तालुक्यातील घोगाव फाट्यावर हा प्रकार घडला होता. कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने केलेल्या आंदोलनाने पोलिसही चक्रावले. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर वक्तव्य केले.

तत्पूर्वी कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्पाच्या माध्यमातून महारयत ऍग्रो कंपनीच्या संचालकांनी ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समजते. गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्कमा परत देवू शकत नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यालयांना टाळे लावून संचालक पसार झाले आहेत. एका वर्षात ७५ हजाराच्या मोबदल्यात १ लाख रुपये मिळणार असल्याने हजारो गुंतवणूकदार आमिषाला बळी पडले. कडकनाथ प्रकल्पाच्या इस्लामूपर येथील कार्यालयासह कागल, राधानगरी, भुदरगड तालक्यातील शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या इस्लामपूर कार्यालयाला टाळे ठोकले आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कडकनाथ कोंबडी पालन करणारी संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबधित आहे. सांगलीतील ज्या कंपनीने ही फसवणूक केली आहे, त्याचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा संघटनेचा अध्यक्ष होता. कंपनीचे नावही ‘रयत’ या नावावरुन दिले आहे. संबधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह खोत यांच्या पुतणीशी झाला आहे. यावरुन ही कंपनी खोत यांच्याशी संबधित आहे. कृषी विभागाकडून या व्यवसायावर ५० टक्के अनुदान देण्याच्या आमिषाने फसवणूक झाली आहे.
शेट्टी यांच्या आरोपाला उत्तर देत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शेट्टी माझ्या जावयाने फसवणूक केली असे म्हणत असतील, तर तो माझा जावई आहे हे सिद्ध करुन दाखवावे, आपण राजकारण सोडतो. जर तो माझा जावई नसेल तर शेट्टी हे राजकारण सोडणार का, हे त्यांनी जाहीर करावे. असे खुले आवाहन केले होते.

तेव्हा राज्यातील सरकारात मंत्री असलेल्या सदाभाऊ खोत तसेच कडकनाथ कोंबडी प्रकरणात मुख्यमंत्री काय भूमिका घेतात यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment