Sunday, June 4, 2023

शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना आता तिसरं पत्र; म्हणाले..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या संकट काळात पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर आलेल्या संकटासंदर्भात मोदींचे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे मागील ३ महिन्यांपासून देशातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. काम ठप्प असल्यानं या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसंच व्याज माफ केले पाहिजे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरणाचीही गरज आहे, असं पवारांनी या पत्रात नमूद केलं आहे.

देशाच्या जीडीपीमध्येही बांधकाम व्यवसाय मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावं आणि आवश्यक पावलं उचलावी, अशी विनंतीही पवारांनी केली आहे. याआधी शरद पवारांनी अडचणीत असलेल्या साखर उद्योगाबाबत १५ मे रोजी आणि कृषी क्षेत्रातल्या संकटाबाबत १८ मे रोजी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. या दोन्ही पत्रांमध्ये पवारांनी पंतप्रधानांना काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीतही पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”