अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर यास वाचविण्यासाठी हत्येच्या प्रकरणाला राजकीय दबावापोटी आत्महत्येचे प्रकरण म्हणून मिटविण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासंदर्भातील आपली अधिकृत भूमिका त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आणि मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहाराद्वारे मांडली आहे.

नक्की प्रकरण काय? – २७ मे रोजी थडीपवनी येथे अरविंद बनसोड आणि त्याचे दोन सहकारी बँकेत पैसे काढायला गेले होते. एचपी गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बनसोड यांचा सहकारी एजन्सीच्या बोर्डाचा फोटो काढत होता. फोटो काढतांना ‘फोटो का काढतो?’ म्हणून एजन्सीतील गुंडांनी त्यांचा मोबाईल हिसकावला. मोबाईल घेण्यासाठी अरविंद आत गेला, तर तिथे एजन्सीचा मालक मिथलेश उमरकर बसलेला होता. त्याने अरविंदला जातिवाचक शिवीगाळ केली. शिवाय जीवे मारण्याची धमकी देत गुंडांसोबत मिळुन मारहाण केली. अरविंद मोबाईल मागत राहिला आणि उमरकर आणि त्याचे गुंड त्याला मारत राहिले. अरविंद बाहेर आला आणि सहकाऱ्यांना येथून जा म्हणाला, त्याचे सहकारी थोडे बाजूला गेले. अरविंद पुन्हा गेला, मोबाईल द्या म्हणाला, त्यांनी यावेळी दोन्हीही मोबाईल घेतले आणि परत अरविंदला मारहाण केली. अरविंद परतला नाही म्हणून थोड्यावेळाने सहकारी तेथे गेले, तर अरविंद जवळच्या गॅस एजन्सीच्या पायरीवर निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या शेजारी कीटकनाशकाची बाटली पडलेलीही दिसून आली. घटनास्थळी लोक जमा झाले म्हणून आरोपी मिथलेश उमरकर अरविंदला गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन गेला आणि औषधसुद्धा सोबत नेलं, पुन्हा गाडीत त्याच्यासोबत काय झालं ते कोणालाच माहीत नाही.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? – अरविंद बनसोडने विष पिऊन आपले जीवन संपवेल यावर अरविंदचे सहकारी मित्र व भाऊ यांचा विश्वास नाही. पूर्ण प्रकरण संशयास्पद असतांना तसेच अरविंदची हत्या करण्यात आली असल्याची दाट शक्यता दिसत असतांना पोलसांनी आत्महत्या म्हणून नोंद केली आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अरविंदची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती व संपूर्ण परिवाराचा तो सांभाळकर्ता होता. अरविंद स्पर्धापरिक्षेची तयारी करत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेचे कामही तो करायचा. एक दलित कार्यकर्ता व्यवस्थेला प्रश्न का विचारतो ? या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप अरविंदच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे.

राजकीय हस्तक्षेप कसा? – आरोपीचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तर आरोपी राष्ट्रवादीचा युवा नेता पंचायत समिती सदस्य आहे. आरोपी मिथिलेश उमरकर हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. त्यामुळे आरोपीस वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव टाकुन प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत असे बोलले जात आहे. या प्रकरणात किरकोळ ३०६, ३४ कलमाअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातच दलित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल, तर ही बाब फार चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष देऊन पुढे नमूद केलेल्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात येत आहे.

प्रमुख मागण्या –

१) जातिवाचक शिवीगाळ व सार्वजनिक ठिकाणी अवहेलना करण्याबाबत “अट्रॉसिटी (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९)” अंतर्गत गुन्हा दाखल करने.

२) ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करणे.

३) कोणत्याही कल्पनेशिवाय कुटुंबीयांना न सांगता, घटनास्थळी हजर असलेले मित्र ‘गजानन राऊत’ ह्याला गाडीत येण्यास मज्जाव करून एकट्या ‘अरविंद बनसोड’ला हॉस्पिटल घेऊन गेले. याबाबतही पोलिसांनी सखोल चौकशी करावी व एकट्या असलेल्या अरविंदशी गाडीत नेमका काय प्रकार घडला याचासुद्धा संपूर्ण तापस करून सत्य उघडकीस आणावे.

४) आरोपी मिथिलेश उमरकरसोबत मारहाण व सहकार्य करणारे मित्र यांचा सुद्धा शोध घेऊन सहआरोपी म्हणून करवाई करावी.

५) मृत अरविंद यांच्या सोबतीला असलेले मित्र ‘गजानन राऊत’ प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांना बयान नोंदविणे कायदेशीर बंधनकारक आहे.

६) पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत व एक सदस्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे.

७) आरोपी ‘मिथिलेश ऊर्फ मयूर बंडोपंत उमरकर’ याचे पंचायत समिती सदस्यपद रद्द करावे.

८) स्थानिक जलालखेडा पोलिस स्टेशनची भूमिका संशयास्पद असून राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव असल्याने सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास नकार व आठवडा होऊन सुद्धा संबंधित आरोपींची साधी विचारपूस/अटक न केल्याने संबंधीत ठाणेदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.

या केसच्या संदर्भात, ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अधिकारी आणि नागपूर पोलीस अधीक्षक(SP) यांच्याशी बोलून चौकशी केली. नागपूर पोलीस अधीक्षक(SP) यांना विनंती केली की, तपास अधिकारी योग्य नाही, व सदर केसचा तपास दुसऱ्या चौकशी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, या मागणीला पोलीस अधीक्षक (SP) यांनी होकार दिला आहे. पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालून पीडितांना न्याय द्यावा असं मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांची यासंदर्भातील फेसबुक पोस्ट –

Leave a Comment